कोण मरेपर्यंत ?

अजित पवार राष्ट्रवादी सोडणार, भाजपात जाणार, अशा चर्चा गेले दोन दिवस रंगल्या. अखेर अजित पवार यांनी, "मरेपर्यंत मी राष्ट्रवादी सोडणार नाही," असं जाहीर करुन यावर पडदा टाकला.

पण माझ्या मनात "वेगळा विचार" आला,
कोण मरेपर्यंत हे दादांनी सांगितलच नाही की ...!!

तुम्ही काडतूस मग बंदूक कोण ?

महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर सध्या खूपच घसरला आहे. राजकारण तत्वावरुन व्यक्तीवर घसरलं आहे. राजकीय मतभेद राजकीय वैरात बदलत आहे. त्यातून एकमेकांवर पातळी सोडून टीका केली जात आहे. नेते आणि त्यांचे समर्थक बगलबच्चे सोडले तर बाकी सामान्य जनता आता या सगळ्या प्रकारांना कंटाळली आहे.

यातलाच एक किस्सा परवा घडला. ठाणे येथे बोलताना उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख "फडतूस गृहमंत्री" असा केला. ठाकरे भक्तांना यामुळे मनस्वी आनंद झाला तर फडणवीस भक्त "आता साहेब याला कसं धुतात ते पहा" असं म्हणत मनात मांडे खाऊ लागले. देवेंद्र फडणवीस ही चांगलेच संतापले. याला उत्तर दिलं नाही तर ते फडणवीस कसले ? त्यांनी मग "मी फडतूस नाही, काडतूस आहे" असं यमक जुळवलं. फडणवीस भक्त बेहद्द खूष झाले. "साहेब, काडतूस आहेत, आत घुसून मारतात..!!" भक्तांनी फडणवीस स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. 

माझ्या मनात मात्र एक "वेगळा विचार" चमकून गेला. काडतूस स्वत: काही करु शकत नाही. ते घुसायचे असेल तर बंदूकीत घालून कुणीतरी उडवावं लागतं. फडणवीस काडतूस असतील तर बंदूक आणि ती चालवणारं कोण ? शहा की मोदी ....??

आनंद कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार, जयसिंगपूर - ४१६१०१

पित्त अजित पवारांना....उलट्या मराठी माध्यमांना...!!

महाराष्ट्रातील राजकीय अध:पतनासारखाच प्रसार माध्यमांचा दर्जाही खालावला आहे. वृत्तवाहिन्या आल्यापासून तर हे खूपच जाणवत आहे. पूर्वी घटना घडली की बातमी व्हायची आता घटना घडावी म्हणून बातमी दिली जाते. संशयाची सुई घेऊन बातमीची लक्तरे शिवण्याचे प्रकार आता अनेकदा अनुभवायला मिळतात.

असाच एक किस्सा काल घडला. राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजित पवार यांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केले, अगदी फोनही बंद केला. अजित पवार नॉटरीचेबल झाल्याचं लक्षात येताच मराठी माध्यमांनी बातमी चालवली, "अजित पवार नॉटरीचेबल, राज्यात कोणती राजकीय घटना घडणार ?" असे या बातम्यांचे स्वरुप होते. माध्यमांनी शरद पवार यांनाही गाठले. अर्थातच त्यांनी नेहमीच्या शैलीतच बरेच काही सांगितले पण पाहिजे ते बोललेच नाहीत. 

आज सकाळी अजित पवार यांनीच खुलासा केला, "मला पित्ताचा त्रास झाला म्हणून मी कार्यक्रम रद्द केले." अजित पवार यांचा आजवरचा इतिहास पाहता त्यांचे पित्त उसळण्याचे कारण नैसर्गिक की राजकीय असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. 

कारण काहीही असेल, पण माझ्या मनात एक "वेगळा विचार" येऊन गेला, 

" पित्त अजित पवारांना... पण उलट्या मराठी माध्यमांना....!!!"

आनंद कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार, 
जयसिंगपूर ४१६१०१

..... यांना आध्यात्मावर बोलण्याचा अधिकार आहे का ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे वक्तृत्व आणि बोलण्याची शैली अत्यंत प्रभावी आहे याबाबत शंकाच नाही. त्यांचे मुद्देही सडेतोड आणि परखड असतात. यामुळे त्यांच्या चाहत्यांचा वर्ग मोठा आहे. 

आपल्याकडे राजकारणात अंध मोदी भक्त आहेत तसेच प्रत्येक पक्षात कमी अधिक प्रमाणात नेत्यांचे अंध भक्त आहेतच. पक्ष रसातळाला गेला तरी गांधी आडनावातच पक्षाचे भवितव्य शोधणारे काँग्रेसवाले, राज्यात कधीच तीन अंकी आमदार निवडून आणता आले नसले तरी पवार साहेबांना देशाचे जाणते नेते म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसवाले, पक्ष संपला तरी शिवसेना म्हणजे ठाकरेच म्हणणारे उध्दव ठाकरे प्रेमी अशी अनेक उदाहरणे या अंध भक्तीची देता येतील. हे सगळे अंधभक्त आपल्या राजकीय नेत्याची व्यक्ती म्हणून विवेकी चिकित्सा करण्यापेक्षा त्याला राजकारणातील दैवत बनवून त्यांचे अनेकदा कंबर कसून समर्थनच करत असतात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही याला अपवाद नाही. मनसेच्या कार्यकर्यांचे राज ठाकरे हे दैवत आहेत. त्यांचा शब्द म्हणजे ब्रह्म वाक्य मानले जाते. शिवसेना सोडून राज ठाकरे यांनी मनसेना स्थापन केली तेव्हा त्यांनी यामागचे कारण सांगताना, "माझा विठ्ठलाशी वाद नाही, बडव्यांशी आहे" अशा अर्थाचे एक विधान केले होते. परवाच्या गुढी पाडवा सभेत शिवतीर्थावर त्यांनी हे वाक्य पुन्हा एकदा उच्चारले. त्यांच्या भक्तांसाठी हे राज ठाकरे यांनी केलेले अतिशय समर्पक व चपखल समर्थन असेलही.... 

पण हे ऐकल्यावर माझ्या मनात मात्र एक 'वेगळा विचार' आला,

"बडव्यांना कंटाळून विठ्ठलालाच सोडणाऱ्यांना आध्यात्मावर बोलण्याचा अधिकार आहे का ?"

आनंद वामन कुलकर्णी
ज्येष्ठ पत्रकार, जयसिंगपूर - ४१६१०१

पुतण्याची पॉवर काका पेक्षा भलतीच जादा की....!!

खा. शरद पवार यांच्या राजीनामा नाट्याचा शेवट आज अपेक्षेनुसारच झाला. त्यांनी आ. अजित पवार यांना एकट पाडून यातून धडा शिकवला अशा स्वरुपाची चर्चा...